नायट्रोजनचे स्थिरीकरण NITROGEN FIXATION
हवेमध्ये नायट्रोजन वायुरूपात असतो, परंतु वनस्पती हा
वायुरूपातील नायट्रोजन शोषून घेऊ शकत नाहीत. त्यासाठी त्याचे स्थिरीकरण होणे म्हणजेच संयुगात रूपांतर होणे आवश्यक असते.
नायट्रोजनचे स्थिरीकरण:-
नायट्रोजनचे स्थिरीकरण जैविक आणि वातावरणीय अशा दोन्ही पद्धतींनी होते. नायट्रोजनचे जैविक स्थिरीकरणया पद्धतीत दोन प्रकारचे सूक्ष्मजीव नायट्रोजनचे स्थिरीकरण घडवून आणतात. रायझोबिअम हे सूक्ष्मजीव द्विदल शिंबावर्गीय वनस्पतींच्या मुळांवरील असलेल्या गाठींमध्ये असतात. हे सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजन शोषून घेतात व त्याचे नायट्रोजनच्या संयुगात रूपांतर करतात. मातीमधील अझिटोबॅक्टर हे सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजनचे त्यांच्या संयुगात रूपांतर करतात.पावसाळ्यात आकाशामध्ये जेव्हा वीज चमकते तेव्हा हवेतील नायट्रोजन आणि ऑक्सिजनचा संयोग होऊन नायट्रिक ऑक्साइड तयार होते व त्याचे पुन्हा ऑक्सिडीकरण होऊन नायट्रोजन डायऑक्साइड बनते.पावसाच्या पाण्यात हे नायट्रोजन डायऑक्साइड विरघळते व त्याचे नायट्रिक आम्लात रूपांतर होते.हे आम्ल पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीवर येते. हे आम्ल जमिनीतील विविध खनिजां बरोबर अभिक्रिया होऊन क्षारांमध्ये रूपांतरित होते. वनस्पती या नायट्रोजनच्या क्षाराचा उपयोग स्वतःच्या वाढीसाठी करतात.