जून-जुलै महिन्यात दुसरी टीईटी ! Maha TET 2026

जून-जुलै महिन्यात दुसरी टीईटी ! राज्य परीक्षा परिषदेकडूनपरीक्षेची जय्यत तयारी सुरू 




केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई वर्षातून दोनदा सीटीईटी परीक्षा घेते. त्याच धर्तीवर राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून, जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दुसरी टीईटी परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती राज्य परीक्षा परीषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे, तर शिक्षण विभागाकडून सध्या सेवेत असलेल्या शिक्षकांना मुख्याध्यापक किंवा अन्य पदोन्नती हवी असेल तर टीईटी उत्तीर्ण शिक्षकांनाच पदोन्नती द्यावी, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

        त्यामुळे आता सेवेत असलेल्या शिक्षकांना किंवा शिक्षक होण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्याशिवाय पर्यायच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे परीक्षा परिषददेखील आता दुसरी टीईटी परीक्षा घेण्याची तयारी करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.दुसऱ्या टीईटीच्या आयोजनासंदर्भात माहिती देताना राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. बेडसे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, शिक्षकांना पुढील दोन वर्षांत टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे शिक्षकांना जास्तीत जास्त संधी मिळावी या दृष्टिकोनातून टीईटी परीक्षेचे आता वर्षातून दोनदा आयोजन केले जाणार आहे. नुकत्याच झालेल्या परीक्षेत एक प्रश्न आम्हाला रद्द करावा लागला, हे आमच्या दृष्टीने योग्य नाही. त्यामुळे यापुढील काळात आयोजित करण्यात येणारी टीईटी परीक्षा अत्यंत पारदर्शकपणे पार पाडण्यात येणार आहे. त्यासाठी प्रश्नपत्रिकांची निर्मिती करत असताना तज्ज्ञांबरोबर चर्चा करून बारकाईने नियोजन करण्यात येणार असल्याचे डॉ. बेडसे यांनी स्पष्ट केले आहे.गुणांमध्ये शिथिलता नाहीच! टीईटी परीक्षेमध्ये पात्र व्हायचे असेल, तर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ६० टक्के म्हणजेच ९० गुण, तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना ५५ टक्के म्हणजे ८३. गुण मिळवणे गरजेचे आहे. सध्या नोकरीत असलेल्या शिक्षकांना अध्यापनाचे कार्य, कौटुंबिक समस्या, आरोग्याचे कारण आदींचा विचार करता किमान सेवेतील शिक्षकांना तरी पात्रतेमध्ये गुणांमध्ये कपात करावी, असा प्रस्ताव विविध शिक्षक संघटना तसेच काही मंत्री आणि आमदारांनी देखील दिला आहे. परंतु त्यांना कोणतीही शिथिलता देण्यासंदर्भातील निर्णय झालेला नाही. परंतु त्यांची अपेक्षा योग्य असल्याचे देखील डॉ. बेडसे यांनी स्पष्ट केले आहे. कोल्हापूर प्रकरणातील टीईटी उमेदवारांचा निकाल राखीव टीईटी परीक्षेदरम्यान कोल्हापूरमध्ये पेपर फुटल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या. यासंदर्भात पोलिसांकडून राज्य परीक्षा परिषदेत चौकशीही करण्यात आली. परंतु प्रत्यक्षात पेपर फुटलाच नसल्याचे डॉ. बेडसे यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर अत्यंत गोपनीय पद्धतीने संबंधित परीक्षा पार पाडण्यात येते. त्यामुळे कमीत कमी हस्तक्षेप असल्यामुळे पेपर फुटण्याचा प्रश्न उद्भवत नाही. कोल्हापूर प्रकरणातील उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आला असून, त्यांची सुनावणी घेण्यात येत असून, त्यानंतर संबंधित उमेदवारांचा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे देखील डॉ.बेडसे यांनी स्पष्ट केले आहे.

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने